नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२०: कोरोनामूळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं होतं. २५ मार्च पासून सुरु झालेलं हे लॉकडाऊन नोकरीला खिळ घालणार ठरलं आहे. गेल्या सहा सात महिन्यांपासून देशातील सर्वच उद्योगधंदे व कार्यालये बंद असल्यानं अनेक लोकांना घरी बसावं लागलं आहे. परिणामी देशात बेरोजगारीचा मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे. त्यातच आता नवीन माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढंल आहे, असं सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीच्या (सीएमआयईई) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालात दिसून आलं आहे.
यापूर्वी जून महिन्यात बेरोजगारी वाढल्याचं आकडेवारीतून दिसून आलं होतं. त्यानंतर जुलैमध्ये रोजगार निर्मितीचे दिलासादायक आकडे आले होते. मात्र, पुन्हा एकदा रोजगार निर्मितीत घट होत असल्याचं सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीच्या अहवालातून समोर आलं आहे.
देशात जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रोजगार निर्मिती घटली असून, यामुळे बेरोजगारी वाढली आहे. जुलैमध्ये बेरोजगारीचा दर ७.४३ टक्के होता. ऑगस्टमध्ये तो ८.३५ इतका नोंदवण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये शहरांमध्ये बेरोजगारीचा दर ९.८३ टक्के नोंदवण्यात आला आहे. तर ग्रामीण भागात ७.६५ टक्के इतका होता. जुलैमध्ये बेरोजगारीचं प्रमाण शहरात ९.१५ टक्के तर ग्रामीण भागात ६.६ टक्के नोंदवण्यात आलं होतं. जूनमध्ये हे प्रमाण १२.०२ टक्के इतकं होतं. ग्रामीण भागातही बेरोजगारीचं प्रमाण १०.५२ टक्के होतं. जुलैमध्ये यात काहीशी घट झाली होती. पण, ऑगस्टमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी