मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह दर 20 टक्क्यांवर, एका दिवसात 1648 नवीन रुग्ण

मुंबई, 23 जून 2022: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागलाय. मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह दर 20 टक्क्यांवर पोहोचला असून, ही चिंतेची बाब आहे. त्याच वेळी, मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1648 नवीन रुग्ण आढळले आहेत. आज मुंबईतील रुग्णालयात 96 कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आलंय. त्यामुळं मुंबईतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 13,501 झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यपालांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राजकीय कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

देशात कोविड-19 चे 12,249 नवीन रुग्ण, 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात एका दिवसात कोविड-19 चे 12,249 नवीन रुग्ण आढळल्याने, कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4,33,31,645 झालीय. त्याच वेळी, आणखी 13 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 5,24,903 झालीय. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,300 ने वाढून 81,687 झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उपचाराधीन प्रकरणे संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.19 टक्के आहेत. कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.60 टक्के आहे. आतापर्यंत 4,27,25,055 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के आहे. देशव्यापी अँटी-कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लोकांना 196.45 कोटी डोस देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी देशातील संक्रमित लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी देशात या प्रकरणांची संख्या एक कोटींहून अधिक झाली होती. गेल्या वर्षी, 4 मे रोजी, बाधितांची संख्या 20 दशलक्ष आणि 23 जून 2021 रोजी ती 30 दशलक्ष पार केली होती. यावर्षी 26 जानेवारीला प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती. संसर्गामुळे प्राण गमावलेल्या 13 लोकांपैकी आठ केरळमधील आणि प्रत्येकी एक दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा