गोल पोस्ट आरोग्य कोविड-१९ ची ताजी स्थिती

कोविड-१९ ची ताजी स्थिती

नवी दिल्ली, दि. २१ मे २०२०: कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने वर्गीकृत,  पूर्वदक्षता घेऊन सक्रीय उपाययोजना सुरु आहेत. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

आतापर्यंत देशभरात कोविड-१९ चे ४५,२९९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात, एकूण ३,००२ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने सुधारत असून सध्या ते ४०.३२% इतके आहे.

भारतात सध्या कोविडचे ६३,६२४ सक्रीय रुग्ण असून या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहे. एकूण सक्रीय रूग्णांपैकी सुमारे २.९४% रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.

सध्या भारतात कोविडचा मृत्यूदर ३.०६% इतका आहे. जागतिक स्तरावरील मृत्यूदर ६.६५%. इतका असून भारतात त्या तुलनेत मृत्यूदर बराच कमी आहे. वेळेत रुग्ण ओळखून त्याच्यावर सुनियोजित वैद्यकीय उपचार करण्याच्या भारताच्या धोरणामुळेच मृत्यूदर आटोक्यात राहिला आहे.

देशातील मृत्यूंचे विश्लेषण केले असता असे आढळले की यात ६४% मृत्यू पुरुषांचे आणि ३६% मृत्यू स्त्रियांचे झाले आहेत. वयानुसार विभागणी करायची झाल्यास, असे लक्षात आले आहे की १५ वर्षे पेक्षा कमी वयोगटातील रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ०.५% इतके आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटात हेच प्रमाण २.५% इतके आहे. तर, ३० ते ४५ वर्षे वयोगटातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण ११.४% इतके आहे. त्यापुढच्या, म्हणजे ४५ ते ६० या वयोगटातील रूग्णांमध्ये हा मृत्यूदर ३५.१% इतका आहे. ६० वर्षे आणि त्यापुढच्या वयोगटातील कोरोना रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ५०.५ टक्के आहे. त्याशिवाय, इतर आजार असलेल्या कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ७३% इतके आहे. ६० वर्षे वयापुढील वृद्ध आणि इतर आजार असलेल्या लोकांना कोविड-१९ चा सर्वाधिक धोका असल्याचे आढळले आहे.

कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्या सवयींमध्ये बदल आणि स्वच्छता तसेच सामाजिक नियमांचे पालन करण्याबाबतची जागृती सतत सुरूच ठेवायची आहे. त्याशिवाय, वैयक्तिक स्वच्छता, हात धुणे, श्वसनाच्या नियमांचे पालन आणि परिसर स्वच्छ ठेवणे यावर सातत्याने भर देण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणे, मास्क घालणे आणि शारीरिक अंतर पाळण्याची सवय कायम ठेवायची आहे. सार्वजनिक समारंभ टाळायचे आहेत. ज्या लोकांना कोरोना होण्याची अधिक शक्यता आहे, अशा हाय रिस्क लोकांनी अत्यावश्यक आणि आरोग्यविषयक कामे वगळता बाहेर जाणे टाळायला हवे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version