‘सितरंग’ चक्रीवादळ : आसाममधील ८३ गावांतील सुमारे ११०० लोक बेघर; पिकांचे नुकसान

कोलकता, २६ ऑक्टोबर २०२२: ‘सितरंग’ चक्रीवादळामुळे आसाममध्ये मंगळवारीही परिस्थिती गंभीर होती. येथील चक्रीवादळामुळे आलेल्या पुरामुळे ८३ गावांतील सुमारे ११०० लोक बेघर झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि पावसामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या आकडेवारीनुसार, वादळामुळे ११४६ लोकांना फटका बसला आहे आणि ३२५.५०१ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘सितरंग’ने सोमवारी आसामवर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. राज्यातील नागाव जिल्ह्यातील अनेक भागात वादळामुळे अनेक झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कलियाबोर, बामुनी, सकमुथिया टी गार्डन आणि बोर्लीगाव येथे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मात्र, या वादळात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

७ राज्यांमध्ये चक्रीवादळाचा इशारा

यापूर्वी हवामान खात्याने ७ राज्यांसाठी अलर्ट जारी केला होता. हाय अलर्टवर ठेवण्यात आलेल्या सात राज्यांमध्ये त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, पश्चिम बंगाल आणि नागालँडचा समावेश आहे. याशिवाय ओडिशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. मंगळवारी ‘सितरंग’चा सर्वाधिक प्रभाव सुंदरबन आणि पूर्व मिदनापूरच्या किनारी भागावर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा