मुंबई : १२ सप्टेंबर ,२०२० : यंदा कोरोनाचे सावट संपूर्ण देशात असल्यामुळे सर्वत्र शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत. याबाबत केंद्र सरकारने शाळा २१ सप्टेंबर पासून सुरू होणार असा निर्णय घेतला होता. परंतु खरंच २१ सप्टेंबर ला शाळा सुरू होणार आहेत का? याबद्दल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शिक्षण विभागाने संस्था चालकांची बैठक घेतली या बैठकीमध्ये २१ सप्टेंबरला शाळा चालू करण्यास संस्था चालकांनी स्पष्टपणे नकार दिला असून याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच घेतला जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
केंद्राने इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा चालू करण्याचे निर्देश दिले. याबाबतची एसओपीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि वाढत चाललेला प्रादुर्भाव हे सर्व पाहता २१ सप्टेंबरला शाळा चालू करणं योग्य नाही, अशी भूमिका घेत सर्व संस्था चालकांनी दिवाळीनंतरत यासंदर्भातील निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
दरम्यान, ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे निवासी शाळा तर अजिबात चालू करू नयेत. मागच्या वर्षी आलेले वेतेनदर अनुदान आता सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी तातडीने द्यावी, अशी मागणीही बैठकीदरम्यान करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे