‘राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा’; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, २० ऑक्टोबर २०२२: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवले असून, राज्यात परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

या पत्रात राज ठाकरे यांनी ‘राज्यात परतीच्या पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

नेमके काय म्हणाले राज ठाकरे ?

यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढला आहे आणि त्यात परतीच्या पावसाने कहर केला. या परतीच्या पावसाने पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामबाबत शेतकरी बांधव चिंतातुर आहेत. ऐन पीक काढणीच्या वेळी हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलंच आहे. पण तेव्हढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा.

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं, असेही ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा