पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी घोडे मारले का? पृथ्वीराज चव्हाण यांचा संतप्त सवाल

सांगली, ११ सप्टेंबर २०२३ : राज्यात सध्या काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त पृथ्वीराज चव्हाण सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान ते माध्यमाशी बोलतना म्हणाले की, सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. असे असताना भाजप मराठा समाजाला सरसकट आरक्षण का देत नाही? तसेच मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देता तर मग, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले आहे का? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण देण्याची तयारी दाखवली आहे. या संदर्भात आंदोलनकर्ते आणि राज्य सरकार यांच्यात अद्याप एकमत झाले नसले तरी याविषयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देता तर मग, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले आहे का? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेतला असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण देखील दिल्लीतून आले मग त्यांनी का आरक्षण दिले नाही, या अजित पवार यांनी केलेल्या टिकेला देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.

अजित पवारांना पक्षांतरामुळे विसर पडलेला दिसत आहे की काय, मी मुख्यमंत्री असताना आपण सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्यावेळी ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. अशी आठवण पृथ्वीराज चव्हाण यांनी करुन दिली आहे. तर देवेंद्र फडणीस यांनी जे २०१८ साली आरक्षण दिले ते फसवणूक करणारे आरक्षण होते, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याच्या आधीच दिल्लीने राज्यघटनेमध्ये १०२ वी घटनादुरुस्ती केली होती आणि त्यामुळे मागासवर्गीय समाजाला आरक्षण देण्याचे सर्व अधिकार हे राष्ट्रपतीने स्वतःच्या हातात घेतले होते, असेही चव्हाण म्हणाले. वास्तविक राज्य सरकारकडे कुठलाही अधिकार राहिला नव्हता आणि त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा कायदा झाला ही निव्वळ फसवणूक होती असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

ज्यांच्याकडे निजामकालीन कागदपत्र, दाखले पुरावे आहेत त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यायच आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, असे गरीब मराठा समाजाला आरक्षण नाही. अशा पध्दतीने आता मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग सरकारने केले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. सरकार निजामकालीन कागदपत्रे आणि पुरावे दाखले ग्राह्य धरत आहे. असे असेल तर आपण शाहू महाराजांचे दाखले ग्राह्य का धरत नाही? असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा