ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांनी रोखून धरली लोकल, अंबरनाथ स्थानकातील प्रकार

ठाणे २८ जून २०२३: पावसाळा सुरू होताच रेल्वेचे टाईम टेबल आणि गाड्यांमधील बिघाडामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा झाला आहे. अंबरनाथमध्ये यार्डातून सुटणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांना बसण्यास रेल्वे पोलिसांनी मनाई केली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे पोलीस आणि प्रवासी यांच्यात वाद होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ऐन गर्दीच्यावेळी ज्यादा लोकल सोडल्या जात नाहीत. त्यातच पावसामुळे लोकल उशिराने धावत आहेत. आणि आता यार्डातून सुटणाऱ्या लोकलमध्येही बसण्यास मनाई करण्यात येत असल्याने प्रवाशांचा पाराच चढला. या संतप्त प्रवाशांनी अंबरनाथमध्ये लोकल रोखून धरली

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील यार्डातून सकाळी ७.५१ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी फास्ट लोकल सुटते. ही लोकल स्टेशनला येण्यापूर्वी यार्डातूनच अनेक प्रवासी लोकलमध्ये बसून जागा अडवून ठेवतात. त्यामुळे प्लेटफॉर्मवरून लोकल पकडणाऱ्यांना जागा मिळत नसल्याची तक्रार आल्याने रेल्वे पोलिसांनी काल यार्डात जाऊन प्रवाशांना लोकलमधून उतरवले. त्यामुळे या प्रवाशांनी १० मिनिटे लोकल अडवून ठेवली. यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कारवाई केल्याने प्रवासी आणि रेल्वे पोलीस यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झाला आणि प्रवाशांनी पुन्हा लोकल अडवून धरली.

यावेळी प्रवाशांनी यार्डातून सुटणाऱ्या प्रवाशांना उतरवता, मग अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर स्थानकातून उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई का करत नाही? असा सवाल केला. प्रवाशांनी अंबरनाथ लोकल रोखून धरत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पावसाची रिमझिम आणि प्रवाशांचे आंदोलन यामुळे अंबरनाथ स्टेशनमध्ये अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. लोकल रोखून धरल्याने रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दीही झाली होती. त्यामुळे रेल्वे पोलीसही आक्रमक झाले. अखेर पोलिसांनी कारवाईचा इशारा देताच प्रवासी बाजूला झाले, मात्र यानंतर उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई होणार का? हे देखील पाहवे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा