दिवाळीचा आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आव्हान

मुंबई, १२ नोव्हेंबर २०२०: सध्या भारतासमोर कोरोना विषाणूचे फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र यामध्ये सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. लॉक डाऊन मध्ये शिथिलता दिल्यानंतर अनेक ठिकाणी सामान्य जीवन पूर्णतः सुरळीत सुरु झाले आहे. सध्याच्या दिवाळी सणाच्या दिवसांत लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. अशातच विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दिवाळीचा आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. स्वत: देखील केवळ सोशल मीडिया, ई मेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाला सणवार-दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महासाथीला इतक्या महिन्यांनंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहोत, हे विसरू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

युरोपातील देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते आहे. त्या ठिकाणी रुग्ण झपाटयाने वाढत असून त्यांच्यासाठी रुग्णालयांची साधनसामग्री, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स कमी पडत आहेत.

दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान बनेल हे ध्यानी घ्या, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा