गोल पोस्ट महाराष्ट्र शहरातील प्रत्येक नागरिकाने शहर स्वच्छतेमध्ये आपले योगदान द्यायला हवे : मुख्यमंत्री

शहरातील प्रत्येक नागरिकाने शहर स्वच्छतेमध्ये आपले योगदान द्यायला हवे : मुख्यमंत्री

मराठवाडा, २५ डिसेंबर २०२२ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शहर स्वच्छता जनजागृती प्रतिष्ठानच्यावतीने औरंगाबाद शहरात क्रांती चौक परिसरात सकाळी ७ वाजल्यापासून स्वच्छ्ता कार्यक्रमाला सुरुवात करत, शहरातील छावणी परिषद, वाळूज औद्योगिक व नागरी वसाहतीमध्ये रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता छावणी परिषदेच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रतिष्ठानच्या कार्यातून सकारात्मक कृतीची प्रेरणा मिळते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान असून विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबतच वृक्ष लागवड, आरोग्य व स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानने अतुलनीय कामगिरी करत आहेत.

यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ.सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्यासह असंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.

  • ७४८ टन कचरा संकलित

प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत ७४ हजार स्वयंसेवकांनी सहभागी होत ७४८ टन कचरा संकलन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच या उपक्रमातून शहर स्वच्छ करण्यासाठी मदतच होईल. देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी देशासाठी काय केले हा विचार रुजविण्याचे मोठे कार्य धर्माधिकारी कुटुंबियांनी केले आहे. हे सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे म्हणूनच आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जातो. यांना वाटते हे सरकार आपले आहे ही भावना महत्वाची आहे. आणि म्हणूनच आम्हाला चांगले काम करण्यासाठी आप्पासाहेब यांची प्रेरणा, ऊर्जा आहे. आम्ही चांगले काम करत राहू अशी भावनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: विनोद धनले

error: Content is protected !!
Exit mobile version