गोल पोस्ट महाराष्ट्र पंढरपूर तालुक्यात वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

पंढरपूर तालुक्यात वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

पंढरपूर, २७ फेब्रुवारी २०२४ : पंढरपूर तालुक्यात गेल्या १५ दिवसापासून भीम नदी काठच्या गावाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज बंडी शेगाव स्टेशन समोर बोंबाबोंब आंदोलन केले. भीमा नदीवरील गुरसाळे बंधाऱ्या काठच्या आठ ते दहा गावांचा वीज पुरवठा अचानकपणे बंद केल्यामुळे त्या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतातील पिकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे नदीकाठचा वीजपुरवठा बंद केल्यामुळे शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. तसेच जनावराच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टंचाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची उभी पिके व जनावरे उपाशी मारण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. या जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. याच्या विरोधात कोणताही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कवठाळी, खेड, भाळवणी आणि शेळवे इत्यादी गावातील शेतकरी आंदोलन करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिल्लारे

error: Content is protected !!
Exit mobile version