गोल पोस्ट इतर असा करा ट्रोलिंगचा सामना…..

असा करा ट्रोलिंगचा सामना…..

पुणे, १७ ऑक्टोबर, २०२२ : नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक सीरीज पाहिली. ज्यात एका १७ वर्षाच्या तरुणीने ट्रोलिंगमुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याचा बदला घेण्यासाठी आणखी एकीने आपल्या मित्राची हत्या केली. हे पाहून मन सुन्न झालं. मनात विचारांचे काहूर माजले की, अरे केवळ ट्रोलिंगमुळे जीव द्यावा किंवा जीव घ्यावा, इतका जीव स्वस्त आहे का? आणि इतके ट्रोलिंग गंभीर आहे का?

तर सर्व प्रश्नांचे उत्तर नाही असं आहे. कारण ट्रोलिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीने त्याच्या मनानुसार केलेली टीका.. आणि प्रत्येक टिकेला उत्तर देणं हे बंधनकारक नाही. त्याचबरोबर प्रत्येक टीकेचा विचार करुन मनस्ताप करण्याची गरज नाही. तसेच जर खरच गंभीर आरोप असतील तर आणि जर तुम्ही ट्रोलिंगचे शिकार होत असाल तर काय काळजी घ्यावी, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…

१. जर तुमच्याबद्दल ट्रोलिंग होत असेल… त्याचबरोबर जर गंभीर विषय नसेल तर जास्त खोलात शिरु नका. विषयाकडे दुर्लक्ष करा.

२. तुम्ही त्या ट्रोलिंगला खरमरीत उत्तर द्या. जेणेकरुन समोरच्याला तुम्ही कमकुवत नाही, हे समजेल.

३. जर सोशल मिडीयावर तुमचे खूप सारे अकाऊंट असतील आणि तुम्ही प्रत्येक अकाऊंटवर ट्रोल होत असाल, तर आता वेळ आली आहे, सगळे अकाऊंट बंद करण्याची. जेणेकरुन तुम्हाला शांती मिळेल.

४. ट्रोलिंगमधले आरोप नीट लक्ष देऊन वाचा. जर गंभीर स्वरुपाचे आरोप असतील तर विश्वासाच्या व्यक्तीला ते सांगा. मनातल्या मनात ठेऊन कुढू नका. अन्यथा त्याचा परिणाम जास्त गंभीर आणि वाईट होण्याची शक्यता असते.

५. काही वेळा विनोद किंवा विनोदी प्रतिसादाने ट्रोलिंग बंद करा.

६. Cut and let go ही संकल्पना अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करा.

७. प्रतिसाद देण्याआधी शांतपणे संपूर्ण मथळा वाचा. त्यानुसार मग प्रतिसाद द्या.

या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी जेव्हा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुनीला डिंगणकर यांच्याशी बातचीत केली, तेव्हा त्यांनी काही प्रमुख मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. त्यांनी सांगितले की, सध्या तरुण वयातल्या आत्महत्याला ७० टक्के ट्रोलिंग कारणीभूत आहे. त्यामुळे मुलांच्या सोशल मिडीयावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच ट्रोलिंग संदर्भात कुठलेही वक्तव्य दिसल्यास मुलांशी चर्चा करणे पालकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे मुलांच्या मनावरचे दडपण कमी होते. मुलांना पालक आपल्याबरोबर आहे हा विश्वास निर्माण होतो आणि त्यांच्या मनावरचे दडपण कमी होते. त्यामुळे मुले-पालक यांच्यात मैत्रीचा बॉण्ड असणे गरजेचे असल्याचे त्यांनी यात नमूद केले.

त्यामुळे ट्रोलिंगला गंभीरपणे घेऊन त्याचा स्वत:च्या अस्तित्वावर परिणाम होऊ देऊ नका… हे सूत्र कायम मनाशी बाळगा…

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

error: Content is protected !!
Exit mobile version