चंद्रपूर जिल्ह्यात पूरामुळे पाच हजार हेक्टर शेतीचे नुकसान, पूर ओसरला सर्व्हेक्षण सुरू

चंद्रपूर, ३१ जुलै २०२३ : चंद्रपुर जिल्ह्यात ८-१० दिवसापासून अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले.अतिवृष्टीमुळे नद्यांना मोठया प्रमाणावर पूर आला होता.आता पुराचे पाणी ओसरल्यावर चंद्रपुरात महसूल विभागाच्या वतीने इरई नदीच्या किनारी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. राज्य आपत्ती निवारण कायद्याच्या निकषांप्रमाणे नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हे अचूक सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत चंद्रपूर शहराच्या हद्दीत ११०० पंचनामे पूर्ण झाले आहेत. मदतीचेही वाटप करण्यात आले आहे. याच भागातील पूरग्रस्तांची १ हजार २०० कुटुंबांची यादी तयार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एकूण तीन हजार कुटुंबांना पूरग्रस्ताची मदत दिली जाण्याचा अंदाज आहे. हे सर्वेक्षण शास्त्रीयदृष्ट्या केले जाणार आहे. येत्या काळात या संपूर्ण भागामध्ये पुराची नेमकी स्थिती, कारणे आणि उपाय योजना याबाबतही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर तालुक्यात सुमारे पाच हजार हेक्टर शेतीवर नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या पोडसा गावातून तेलंगणात जाणारा महामार्ग ठप्प झाला आहे. हा उंच पूल वर्धा नदीवर नव्याने काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. मात्र गेल्या आठ दिवसात वर्धा नदीला आलेल्या महापुराने या पुलाचा पोचमार्ग वाहून गेला आहे. हा तेलंगणाकडे जाणारा चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावून रास्ता बंद ठेवला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने गेल्या काही दिवसात पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. पूल-रस्ते व बंधारे यांना याची मोठी झळ पोचली आहे. पुढील दोन महिने पावसाचे शिल्लक असताना बंद, खराब झालेले मार्ग- पूल यांची दुरुस्ती कधी होणार याकडे सीमावर्ती भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा