मानवतेच्या दृष्टीने मजूरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे आकारु नका

मुंबई, दि. ४ मे २०२०: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अडकलेल्या मजूर, कामगार व विद्यार्थींना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. भिवंडी, नाशिकहून विशेष रेल्वे गाड्या रवाना झाल्या आहेत. या गाड्यांमधून जाणारे मजूर हे गरीब आहेत. कोरोनामुळें त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली. अशा परिस्थितीत रेल्वेच्या तिकिटासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नसतील. काही ठिकाणी कमी पडलेले तिकिटाचे पैसे स्वयंसेवी संस्था, संघटनांनी भरले आहेत. त्यामुळे तिकिटाचे पैसे माफ केल्यास त्यांना आधार मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सांगितले.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. या वेळी त्यांनी घरी परतणाऱ्या परराज्यातील मजूर, कामगारांकडून मानवतेच्या दृष्टीने रेल्वेच्या तिकीटाचे पैसे न घेण्याची केंद्र सरकारला विनंती केली.

मजूरांना मदत चालूच राहणार:

सुमारे ५ लाख परप्रांतीय मजूरांची राज्य शासनाकडून निवारा आणि जेवणाखाण्याची साधारणत: ४० दिवस व्यवस्था केली गेली. जोपर्यंत सर्वजण आपापल्या घरी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मजूरांना दिलासा मिळाला आहे.

व्यवस्थित नियोजन करावे:

कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी रेल्वेशी देखील चांगला समन्वय ठेवावा असे त्यांनी सांगितले. तसेच इतर राज्य सरकारांशी सुद्धा चांगला समन्वय ठेवावा असे त्यांनी सांगितले. याबरोबरच त्यांची वैद्यकीय तपासणी व इतर कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन त्यांना पाठवावे यामध्ये कुठेही गोंधळ होऊ नये असे निर्देश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

निवारा केंद्रातील सर्व कामगारांची यादी अद्ययावत करावी. आज ना उद्या मुंबई, ठाणे, पुणे येथून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय झाल्यास या कामगारांच्या प्रवासाचे व्यवस्थित नियोजन जिल्हाधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावे असे त्यांनी सांगितले.

राज्यांतर्गत ठिकठिकाणी अडकलेल्या व्यक्तींच्या गटांना त्या-त्या जिल्ह्यांत जाण्याची परवानगी ही सर्व बाबींचा विचार करून व लॉकडाऊनच्या नियमाप्रमाणे करावी. अडकलेल्या व्यक्ती या नागरिक आहेत, परिस्थितीमुळे त्यांना थांबावे लागले, त्यादृष्टीने याकडे पहावे असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा