पुण्यात कचऱ्याचा महास्फोट स्वच्छ शहराची ओळख धोक्यात..!

26

पुणे १० फेब्रुवारी २०२५: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. स्वच्छ व सुंदर शहराच्या प्रतिमेला डाग लागण्याची भीती निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि आरोग्य संकट

शहरातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रोड, मंडई परिसर, तसेच डेक्कन आणि स्वारगेट या अत्यंत गजबजलेल्या भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने जागोजागी दुर्गंधी पसरली आहे. त्यातच पावसाळ्याच्या दिवसांत या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत आहे. डेंग्यू, मलेरिया, आणि गॅस्ट्रो सारख्या आजारांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे.

महापालिकेची उदासीनता, नागरिक संतापले

नियमित सफाई न झाल्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत. स्थानिक रहिवासी आणि व्यापारी यांनी याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी ठोस उपाययोजना होत नाहीत. “कर भरायचा आमच्यावर, पण सुविधा मात्र झिरो!” असा सवाल पुणेकर नागरिक विचारत आहेत.

पर्याय आणि उपाययोजना हवीत

तज्ज्ञांच्या मते, कचऱ्याच्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अधिक प्रभावी कचरा व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. कचऱ्याचे योग्य वेगळेपण, पुनर्वापर आणि कंपोस्टिंगसारख्या उपाययोजना त्वरित राबवण्याची मागणी जोर धरत आहे.

पुणे महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास “स्वच्छ पुणे, सुंदर पुणे” ही केवळ घोषणा उरणार असून, वास्तव मात्र वेगळे असेल!

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा