डोंबिवली, दि. ८ ऑगस्ट २०२०: मनसे आमदार राजू पाटील यांनी २६ जुलै रोजी कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती, आता ही मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
राजू पाटील यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले होते. त्यात त्यांनी म्हंटले होते की कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात. दरवर्षी रेल्वे व राज्य परिवहन सेवा सुरू असल्याने त्यांना गावी जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नव्हती. यावर्षी कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशासह राज्यावर आले आहे.
वास्तविक महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक सह इतर रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. त्याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करावी ही मागणी मान्य झाल्याने सध्या चाकरमान्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांच्या कामाचे चहूबांजूनी कौतूक केले जात आहे .
न्यूज अनकट प्रतिनीधी : राजश्री वाघमारे