गोल पोस्ट हवामान हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस… अनेक ठिकाणी भूस्खलन, आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू

हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस… अनेक ठिकाणी भूस्खलन, आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश अतिवृष्टी, २१ ऑगस्ट २०२२: हिमाचल प्रदेशात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. शिमल्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. कांगडा, चंबा, मंडी येथे पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३० हून अधिक फ्लॅश पूर आल्याची नोंद आहे. यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी सांगितले की, मंडी, कांगडा आणि चंबा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ते म्हणाले की मंडीतील मनाली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग आणि शोघीमधील शिमला-चंदीगड महामार्गासह ७४३ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

उपायुक्त अरिंदम चौधरी यांनी सांगितले की, एकट्या मंडीमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात १३ जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण बेपत्ता झाले.

मंडी येथे घर कोसळले

मंडी येथे घर कोसळल्याने 7 जण गाडल्याचे वृत्त आहे. २ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. कांगडा येथे इंग्रजांच्या काळातील रेल्वे मार्गाचा चक्की पूलही तुटला आहे. चंबामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाचेही वृत्त आहे. राज्यात ३० हून अधिक ठिकाणी नुकसान झाल्याची नोंद आहे.

प्रशासन काय म्हणतंय

राज्याचे महसूल प्रधान सचिव ओंकार शर्मा यांनी सांगितले की, राज्यात पावसाळ्यात आतापर्यंत २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी २२ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील ३३६ लहान-मोठे रस्ते बंद करण्यात आले आहेत. १५२५ ट्रान्सफॉर्मरही बंद आहेत. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. सर्व जिल्हा प्रशासनांना बाधित ठिकाणी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हिमाचलमध्ये येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना राज्य सरकारने हिमाचलमध्ये न जाण्याचे आवाहन केले आहे. चंबामध्ये प्रशासनाने प्रवास न करण्याचे आधीच आवाहन केले होते, मात्र लोक स्वतःहून प्रवास करत आहेत. तेथे भूस्खलनात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता

ओंकार शर्मा म्हणाले की, गेल्या वर्षी हिमाचलमध्ये मान्सूनच्या हंगामात सामान्यपेक्षा उणे १३ ते उणे २६ पाऊस पडला होता. तर यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत आहे. कांगडा येथे सर्वाधिक ३३० आणि ३४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पावसासाठी हवामान खात्याने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version