पुढील 48 तासांत राज्यात मुसळधार पाऊस, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता

मुंबई, 29 सप्टेंबर 2021: अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा राज्याला जोरदार फटका बसला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी नाशिक 1, जालना 1, बीड 2, उस्मानाबाद 2, परभणी 2, लातूर 1, बुलढाणा 1, यवतमाळ 3 मृत्यू झाले आहेत. तर 4 जण जखमी झाले आहेत. 205 जनावरांचे या पुरात मृत्यू झाले आहेत. एनडीआरएफ एअर फोर्सची एक तुकडी कार्यरत आहे तर एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत कार्य सुरु आहे. त्यातच आता पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. काल मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून धरणं आणि नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पण अजून संकट संपलं नाही. पुढील 48 तास राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर 30 सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असून, अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे.

राज्यात पुढील 24 तासात गुलाब चक्रिवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे विदर्भात प्रभाव कमी असणार असून बुधवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव राहिल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

आपत्कालीन मदत यंत्रणांनी सतर्क राहावे

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं रेड अलर्ट असलेल्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तसंच ऑरेंज अलर्ट असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांच्या प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्य व जिल्ह्यांच्या आपत्कालीन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तत्काळ सुरु करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा आपत्कालिन मदत यंत्रणांना दिल्या आहेत.

मराठवाड्यात पुरामुळे हाहाःकार

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं संपूर्ण मराठवाड्याला फटका बसला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी पूर आला आहे. 35 जणांचा मृत्यू, 4 ते 5 हजार जनावरं वाहून गेली आहे, 20 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं असल्याची मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती दिली. मुसळधार पाऊस आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झालं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेऊन असून नुकसानाचं प्रमाण कमी राहावं यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळं औरंगाबाद शहरालाही फटका बसला. औरंगाबादमध्ये सोमवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले.

नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून. मुसळधार पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर चक्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्यानं पाण्याचा प्रश्‍न सुटण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा