भाभा अणु संशोधन केंद्राने बनवला उच्च प्रतीचा फेस मास्क

मुंबई, दि. १४ जून २०२०: अणु ऊर्जा विभागाशी संलग्न भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) मुंबई येथे उच्च प्रतीचा फेस मास्क विकसित केला गेला आहे. एचईपीए फिल्टरचा वापर करुन हा मास्क विकसित केला असून तो किफायतशीर देखील आहे.

ईशान्येकडील प्रांत विकास मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणू उर्जा आणि अंतराळ मंत्री, डॉ जितेंद्र सिंह यांनी गेल्या वर्षभरातील विभागाच्या काही प्रमुख कामगिरीचा उल्लेख करताना ही माहिती दिली.

उल्लेखनीय बाब म्हणजे अणु उर्जा विभागाकडे संशोधन व विकास, शैक्षणिक संस्था, अनुदानीत रुग्णालये, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम इत्यादींचा समावेश असलेले जवळपास ३० विभाग आहेत. प्रख्यात वैज्ञानिक डॉ. होमी जे. भाभा यांनी स्थापन केलेले मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्र देखील अणु ऊर्जा विभागाच्या सहकार्याने कार्यरत आहे.

गेल्या एक वर्षात अणुऊर्जा विभागाच्या महत्वपूर्ण कामगिरीचा आणि उपक्रमांचा उल्लेख करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या मदतीसाठी येणाऱ्या वैज्ञानिकांचे कौतुक केले. अणू/परमाणु शास्त्रज्ञांनी उच्च दर्जाच्या फेस मास्क व्यतिरिक्त, किरणोत्सर्जन प्रभावलोपनानंतर वैयक्तिक संरक्षक उपकरणांचा (पीपीई) पुन्हा वापर करण्यासाठी नियमावली विकसित केली असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी प्रमाणित मानक प्रणाली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे ते म्हणाले.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, वास्तविक वेळेत पीसीआर चाचणी कीट विकसित करण्यासाठी नवे प्रदेश शोधण्याचे कामही पूर्ण झाले आहे. कीट तुलनेने अधिक किफायतशीर असून तुलनेने वेगवान विश्लेषण करेल अशी अपेक्षा आहे.

गेल्या सहा वर्षात अणुऊर्जा विभागाला देण्यात आलेल्या विशेष प्रेरणा आणि अर्थसंकल्पीय तरतुदीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटीं रुपयांच्या पॅकेजचा उल्लेख केला आणि सांगितले की विविध फळे आणि भाज्यांची साठवण कालमर्यादा वाढविण्यासाठी देशभरात विकिरण प्रकल्पाची उभारणी करणे देखील यात समाविष्ट आहे.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, मोदी सरकारच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे आम्ही अणुउर्जेचे कामकाज देशाच्या विविध भागात वाढवले आहे, जे आत्तापर्यंत दक्षिण भारत किंवा पश्चिमेकडील महाराष्ट्रासारख्या काही राज्यांपुरते मर्यादित राहिले होते. दिल्लीच्या अगदी जवळ असलेल्या गोरखपूर नावाच्या ठिकाणी उत्तर भारतात पहिला अणु प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा