गोल पोस्ट आरोग्य केंद्र सरकारनं मागणीप्रमाणं लस पुरविल्यास राज्यात दररोज आठ लाख नागरिकांचं लसीकरण करु:...

केंद्र सरकारनं मागणीप्रमाणं लस पुरविल्यास राज्यात दररोज आठ लाख नागरिकांचं लसीकरण करु: राजेश टोपे

मुंबई, १ मे २०२१: सध्या राज्यभर कोरोना चं संकट ओढावलं आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यात लसीकरण होण्याची देखील गरज सध्या निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून याबाबत केंद्राकडं सातत्यानं मागणी देखील केली जात आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा केंद्राकडं जास्त लसी देण्याबाबत मागणी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सर्वात पुढं आहे. तसंच राज्यात लस वाया जाण्याचं प्रमाण देखील अवघा एक टक्का आहे. तेच देशातील इतर राज्यात हे प्रमाण ४ ते ६ टक्क्यांपर्यंत आहे. हे सर्व निकष पाहता राज्याला अधिक प्रमाणात लस मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्यात १३ हजार संस्था आहेत. यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपचार केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अशा संस्था येतात. या प्रत्येक केंद्रावर दिवसाला १०० लसी दिल्या तरी राज्यात रोज १३ लाखांचं लसीकरण होऊ शकतं. ही महाराष्ट्राची शक्ती असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्य सरकार जेवढ्या प्रमाणात लसींचा पुरवठा मागत आहे, तेवढ्या प्रमाणात केंद्र सरकारनं लस पुरविल्यास राज्यात दररोज आठ लाख नागरिकांचं लसीकरण करु शकतं, अशी भूमिका राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी मांडली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version