काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, राज्यात खांदे पालटाची शक्यता

मुंबई, ११ जुलै २०२३ : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकताच राष्ट्रवादीतील एक गट भाजपसोबत सत्तेत सामील झाला आहे. अशातच आता काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांवर आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने ही बैठक बोलावली आहे. यात विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणारआहे. महाराष्ट्रातील बडे नेते या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण,बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर हे नेते बैठकीसाठी दिल्लीत आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सध्या नाना पटोले यांच्याकडे आहे. पण त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. हे पद नाना पटोले यांच्याचकडे कायम ठेवायचे की नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी द्यायची याबाबत या बैठकीत चर्चेची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी घडण्याअगोदर महाराष्ट्रातील काही वरिष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलासाठी केंद्रातील वरिष्ठ पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.

अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्र्वादीतील एक गट घेऊन ते भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता काँग्रेसकडे हे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर हे पद काँग्रेसकडे आले तर कोणाला द्यायचे यावरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. त्याच पाठोपाठ आता काँग्रेसमध्येही मोठे बंड होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसमध्ये फूट पडू नये यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व प्रयत्नशील आहे. या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चेची शक्यता आहे.अजित पवार यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहेत. अशातच काँग्रेसमध्ये ही अस्वस्थता पसरू नये, यासाठीही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

पुढील वर्षी २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस रणनिती ठरवणार आहे. अधिकाधिक लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी काय करता येईल, यावरही बैठकीत चर्चेची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा