इंदापूर, दि.११ मे २०२०: इंदापूर तालुक्यातील कळाशी, गंगावळण , वरकुटे बु., लोणी देवकर आणि न्हावी परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेकडो एकर जमिनीवरील शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले.
यामध्ये प्रामुख्याने उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील केळीच्या बागा डाळिंब , द्राक्ष तसेच काही ठिकाणी पपई आणि ऊस त्याचबरोबर कडवळ देखील जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
सध्या कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्याचा माल शेतातच पडून खराब होऊ लागला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे.
त्यातच रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे कळाशी येथील शेतकरी पोपट कांबळे यांची पाच एकर क्षेत्रातील केळीची बाग अक्षरशः जमीनदोस्त झाली. लाखो रुपये खर्चून केळीची रोपे आणि ड्रिपची व्यवस्था आणि त्यासाठी लागणारी औषधे यावर लाखोंचा खर्च करून ही बाग त्यांनी उभा केली होती.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग अक्षरशः जमीनदोस्त झाली त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीबाबत यांनी ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना सांगितले आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या झालेले नुकसानीचा पंचनामा करून प्रशासनाने आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी “न्यूज अनकट”शी बोलताना केली.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे













































