हिंगोलीतील कुरूंदा येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी

हिंगोली २७ जून २०२३: वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील साई गल्ली भागात, विजेच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाला असुन अन्य ४ जण गंभीररीत्या भाजल्याने जखमी झाले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. संतोष गंगाधर दळवी वय ३५ असे मृत तरुणाचे नाव आहे.

कुरुंदातील साई गल्ली भागात संतोष यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या टीनपत्र्यावरुन विदयुतवाहिनी जाते. ही वाहिनी कट झाल्यामुळे घरावरील पत्र्यांत वीज प्रवाह उतरला होता. हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. आज सकाळी सातच्या सुमारास गंगाधर दळवी हे वाळत घातलेला टॉवेल काढण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का बसला. हा प्रकार त्यांचा मुलगा संतोष यांच्या लक्षात आला. त्यांनी वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला.

यावेळी घरात त्यांचे दोन भाचे आणि पत्नी यांनाही विजेचा धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले. संतोष व त्यांचे वडील गंगाधर दळवी गंभीररीत्या भाजल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच संतोष यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतर जखमींना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात आलयाची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा