गोल पोस्ट आरोग्य कोरोना रिकव्हरी बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर…!

कोरोना रिकव्हरी बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर…!

नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२०: कोरोनातील वाढत्या प्रकरणांमध्ये भारत अमेरिकेनंतर जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. असं असलं तरी आता एक चांगली बातमी समोर आलीय. कोरोना रिकव्हरी म्हणजेच कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय. याचा अर्थ असा आहे की, कोरोना मधून बरे होणारे सर्वाधिक लोकं भारतात आहेत. शनिवारी आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिलीय. आतापर्यंत, ४२,०८,४३१ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच भारतातील कोरोना रिकव्हरी प्रमाण आता जवळपास ८० टक्के झालंय. तर मृत्युदर १.६१ वर आलाय.

शनिवारी देशात एका दिवसात ९३,३३७ नवीन रुग्ण आढळले परंतु, या काळात अधिक लोक संसर्गमुक्त देखील झाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत ९५,८८० लोक संसर्गमुक्त झाले आहेत. याचवेळी कोरोना विषाणूच्या संसर्गाची ९३,३३७ नवीन प्रकरणे नोंदली गेली असून त्यामध्ये देशात कोविड -१९ चे एकूण, ५३,०८,०१४ रुग्ण आढळले आहेत.

आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण ,४२,०८४३१ लोकं संसर्ग मुक्त झाले आहेत. तसेच रिकवरी दरदेखील ७९.२८ टक्क्यांपर्यंत वाढलाय. गेल्या २४ तासांत १,२४७ संक्रमित लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ८५,६१९ पर्यंत वाढला आहे. कोविड -१९ चे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन १.६१ टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कोविड -१९ संसर्गित १०,१३,९६४ रुग्णांवर सध्या देशात उपचार सुरू आहे, जे संक्रमणाच्या एकूण घटनांपैकी १९.१० टक्के आहे.

महत्त्वाचे म्हणजे ७ ऑगस्ट रोजी कोविड -१९ च्या रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढं गेली, तर २३ ऑगस्टला कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ३० लाखांच्या पुढं गेली. ५ सप्टेंबर रोजी देशात संसर्ग झालेल्यांची संख्या ४० लाखांवर पोहोचली. त्याच वेळी, १६ सप्टेंबर रोजी, देशात कोविड -१९ रूग्णांची संख्या ५० लाखांच्या ही पुढं गेली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version