यूपी, बिहार, महाराष्ट्रसह देशातील १२ राज्यांमध्ये इसिस सर्वाधिक सक्रिय

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२०: जगभरात दहशतवाद झपाट्यानं वाढताना दिसतोय. याला आळा घालण्यासाठी संपूर्ण जगातील नेते एकत्र येत आहेत. भारतही दहशतीच्या सावटातून सुटू शकला नाही. दहशतवादाच्या मुद्यावर भारत अनेक आघाड्यांवर लढा देत आहे. गृह मंत्रालयानं आज राज्यसभेत दहशतवादाच्या मुद्दय़ावरील प्रश्नाला उत्तर दिलं. गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी माहिती दिली की देशात अशी १२ राज्ये आहेत जिथं आयएसचे अतिरेकी सर्वाधिक सक्रिय आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर सारख्या राज्यांचा समावेश आहे.

आयएसचे अतिरेकी सर्वाधिक सक्रिय असलेल्या राज्यांविषयी राज्यसभेत लेखी उत्तर देताना गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, एनआयएच्या तपासणीत इस्लामिक स्टेट (आयएस) केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, आणि जास्त करून जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक कार्यरत आहे.

एनआयएनं आणखी नऊ लोकांना ठरवलं दोषी

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) च्या विशेष न्यायाधीशांनी इसिस संबंधित प्रकरणात आणखी नऊ जणांना दोषी ठरवलंय. यापूर्वी या प्रकरणात सहा जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयटी (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेच्या नऊ दहशतवाद्यांना देशविरोधी कार्यात गुंतल्याबद्दल पटियाला हाऊसमधील विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कोर्टानं दोषी ठरवले आहे.

त्यांच्यावर मुस्लिम तरुणांना भारतात आयएस स्थापन करण्यासाठी संघटित केल्याचा आरोप होता. दोषींनी जुनुद उल खिलाफा फिल हिंद नावाची संस्था स्थापन केली, जी आयएससाठी काम करत होती.

एनआयएनं २०१५ मध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात इतर सहा जणांना आधीच दोषी ठरविण्यात आलं आहे. विशेष कोर्टानं मोहम्मद नफीस खान, अबू अनस, नजमुल हुडा, मोहम्मद अफजल, सुहेल अहमद, मोहम्मद उबेदुला, मोहम्मद अलीम, मुफ्ती काश्मी आणि अमजद खान यांच्यावर आरोप ठेवलेत. दोषींवर २२ सप्टेंबर रोजी चर्चा होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा