मणिपूर हिंसेवरून राष्ट्रपतींना चीड येत नाही का? ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांचा संतप्त सवाल

मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ : मे महिन्यात मणिपूर येथे महिलांची विवस्त्र धिंड काढलेला प्रकार काही दिवसांपूर्वी समाजात समोर आला. याबाबत आता मणिपूर येथील हिंसेवरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच सवाल केला आहे. दोन दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. तिकडे ओपन फायरिंग सुरू आहे. घरे पेटवत आहेत. महिलांना विवस्त्र फिरवले जात आहे. दुर्दैवाने राष्ट्रपतीही महिला आहेत. राष्ट्रपती रबर स्टँप आहेत हे खरेच आहे. आम्ही भेटलो. त्याही अशाच समाजातल्या आहेत. पण तुम्हाला राग येत नाही का?, चीड येत नाही का?, असा संतप्त सवाल खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा काल मुंबईत संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी अरविंद सावंत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला. बाजारात सगळेच विकाऊ आहेत. पण विकली न जाणारी सगळी माणसे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडकडे आहेत. आमचे नाव गेले, चिन्ह गेले. पण तुम्हाला अभिमान वाटेल. निष्ठावंतांची गंगा मातोश्रीवर जोरदार वाहत होती. कठीण प्रसंगी अनेक जण उभे राहिले. कम्युनिस्ट पक्ष आला. संभाजी ब्रिगेड आली. भगवा तर फडकवायचाच आहे. पण महाराष्ट्राचे हित जोपासायचे आहे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे अरविंद सावंत म्हणाले.

गेल्या दहा वर्षात आमच्या मुंबई बंदराचा विकास झाला नाही. विकासाचे स्वप्न उद्धव ठाकरेंनी पाहिले होते. तुम्ही विकास केला नाहीच पण करूही दिला नाही. इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर गुजरातला घेऊन गेलात. हुतात्म्यांनी प्राण देऊन मुंबई मिळवली आहे. तुमचे योगदान काय आहे त्यात? असा सवाल करतानाच जेएनपीटीही गुजरातला नेली. गिरण्यांचे पुनरुज्जीवन केले जात नाही. ती जिवंत मुंबई आम्ही पाहिली. त्या मुंबईसाठी तुम्ही एकही काम केले नाही, असे सावंत म्हणाले.फक्त फॉक्सकॉनच नाही, अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर नेले आहेत. तुम्ही देशाचे पंतप्रधान की गुजरातचे पंतप्रधान आहात? सगळे तिकडे जात आहे. मिंधे शिंदे म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक. हा कलंक कसा पुसणार? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.

राज्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा मांडला. दहा वर्ष झाली अजूनही दर्जा मिळाला नाही. बेळगावचा मुद्दा तसाच राहिला. फक्त अर्थ संकल्पाच्य़आ शेवटच्या पानावर बेळगाव, कारवारचा प्रश्न असतो. जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा देवेंद्र फडणवीस मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी कर्नाटकात जातात. गद्दार मिंधेही तिकडे गेले. कर्नाटकाला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे, असे सांगतानाच लडाख, काश्मीर हे भाजपचे सर्वात मोठे अपयश आहे. ते लपवायचे असेल म्हणून त्यांचे हिंदू, मुस्लिम सुरू आहे, असेही अरविंद सावंत म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा