जम्मू काश्मीरमधील महिलांनी बनवलेली उत्पादने विक्रीसाठी पेटीएमवर

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील महिलांनी बनविलेली स्थानिक उत्पादने आता पेटीएमवर विक्रीसाठी उपलब्ध केली जात आहेत.त्यासाठी खादी ग्रामोद्योग आणि पेटीएम यांच्यात करार करण्यात आला आहे.

या नव्या करारामुळे जम्मू काश्मीरच्या महिलांना रोजगार मिळणार आहे. शिवाय महिला सशक्तीकरणासाठी त्याचा उपयोग होणार आहे. याची सुरुवात काश्मिरी रुमाल विक्रीपासून करण्यात येत आहे. त्यानंतर महिलांनी बनविलेली अन्य उत्पादने विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत.

या संदर्भात रस्ते वाहतूक आणि राज्यरस्ते मंत्री नितीन गडकरी म्हणाले, जम्मू काश्मीरच्या आतंकवादी प्रभावित क्षेत्रातील महिलांपासून या उपक्रमाची सुरवात केली गेली आहे. या महिलांनी बनविलेले रुमाल विकले जाणे ही त्यांच्यासाठी रोजगार संधी आहे. शिवाय दहशतवादाला आळा घालण्याचा तो एक मार्ग आहे. कारण अपुरी कमाई हेही अनेक तरुण दहशतवादाकडे वळण्यामागच्या अनेक कारणांतील एक आहे. रोजगार मिळाला तर दहशतवादाच्या दिशेने जाणारे अनेक त्यापासून दूर राहतील.

याबाबत खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष विजय कुमार सक्सेना म्हणाले की, सुरुवातीला रुमाल बनविण्यासाठी खादीचे कापड पुरविले जाणार आहे. २ कोटी रुमाल पेटीएमच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. देशभरात असे ५ कोटी रुमाल विकले जातील. पंतप्रधान रोजगार योजनेखाली ८६ हजार रोजगार दिले गेले आहे. लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी १२० केंद्र सुरु केली गेली आहेत. मध आणि पॉटरी विभागातही चांगले काम सुरु झाले आहे. नगरोटा या आतंकवाद पिडीत भागात १५० महिला या उद्योगात सामील झाल्या असून येथेच ५ कोटी रुमाल बनविले जात आहेत.

या रुमालांसाठी १ कोटी २५ लाख मीटर कपडा लागणार असून २५ लाख किलो कापूस वापरला जाणार आहे. त्यातून कारागिरांना ८८ कोटी रुपये मिळणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा