Justice for Vaishnavi Hagwane: हुंडाबळीची शिकार झालेल्या वैष्णवी हगवणे हिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि तिच्यासाठी न्यायाची लढाई अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मोरवाडी येथील एसएनबीपी लॉ कॉलेज आणि इतर नामांकित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळी भव्य कँडल मार्च काढला. या भावनिक आणि प्रेरणादायी मार्चमध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यांनी हुंडाबळीविरोधात आणि सामाजिक न्यायासाठी एकजुटीने आवाज उचलला.
एसएनबीपी लॉ कॉलेज येथून सुरू झालेल्या या कँडल मार्चमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. शांततापूर्ण पण दृढ निश्चयाने विद्यार्थ्यांनी हातात कँडल्स घेऊन वैष्णवीच्या स्मरणार्थ आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रतिज्ञा केली.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी महेश खांडेकर, प्रशांत मोरे, विशाल मानकर, स्नेहल लांडगे, पंकज गीते, अश्विन आखाडे, अक्षय कुल आणि अभिराज कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी वैष्णवीच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना केली आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या प्रसंगी ज्ञानल सांडभोर, स्मृती भोसले, नम्रता कांबळे, श्रेष्ठी शेळके, तुषार मानकर, शांताराम गायकवाड, तानाजी निंबाळकर, तेजस गवळी, अजिंक्य भालके, कृष्णा राठोड, आविष्कार दहिवाड, माउली जोराडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या मार्चच्या यशस्वी आयोजनासाठी रूपेश कुचेकर, प्रेम बर्वे आणि हर्ष गोढवानी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कँडल मार्च दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत गंभीरपणे अशी प्रतिज्ञा केली की, वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल. त्याचबरोबर, निष्पाप मुली पुन्हा हुंडाबळी ठरून जीव गमावू नयेत यासाठी शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांतून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. हा कँडल मार्च केवळ श्रद्धांजली नसून, सामाजिक बदलाची आणि न्यायाची एक नवी मशाल पेटवणारा ठरला.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे