शेतकरी बांधवांशी होणारा संवाद अधिक उत्तम आणि अखंड व्हावा, यासाठी कृषी विभागाने एक अभूतपूर्व आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शासकीय अधिकारी बदलले की त्यांचा संपर्क क्रमांक बदलत असे, पण त्या समस्येवर कृषी विभागाने पूर्णविराम दिला आहे!
महावितरण कंपनीच्या यशस्वी कार्यपद्धतीचा आदर्श घेत, कृषी विभागाने आता जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी संपर्क क्रमांक देण्याची योजना सुरू केली आहे. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, अधिकाऱ्याची बदली झाली तरी त्यांचा मोबाईल क्रमांक बंद होणार नाही; तो त्वरित नवीन अधिकाऱ्याकडे कार्यरत राहील.
या योजनेत, राज्यभरातील तेरा हजार १४१ अधिकाऱ्यांसाठी खास सिम कार्ड वाटप केले जात आहे. हे सिम कार्ड वापरणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर, ते सिम कार्ड नवीन अधिकाऱ्याकडे हस्तांतरित केले जाईल.
शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ?
या बदलामुळे शेतकरी बांधवांना खालील फायदे त्वरित मिळतील
- सतत मार्गदर्शन: पीक सल्ला, रोग-किड व्यवस्थापन किंवा शेतीतील कोणत्याही समस्येवर अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन न थांबता मिळत राहील.
- योजनांची तत्काळ माहिती: नवीन कृषी योजना, तंत्रज्ञान आणि हवामानाची अचूक माहिती लगेच उपलब्ध होईल.
- तक्रार निवारण सोपे: तक्रार नोंदवणे आणि त्याचे निवारण होणे ही प्रक्रिया अतिशय सुलभ बनेल.
हा निर्णय म्हणजे शेतकरी आणि विभाग यांच्यातील विश्वासाचा आणि सेवेचा नवा अध्याय सुरू करणारा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
