गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा कुरकुंभ येथे रासायनिक डिस्टीलेशन कंपनीला आग

कुरकुंभ येथे रासायनिक डिस्टीलेशन कंपनीला आग

कुरकुंभ, दि.२२ मे २०२० : कुरकुंभ (ता.दौंड) येथील रासायनीक प्रकल्पातील कुसुम डिस्टीलेशन अँन्ड रिफायनरी प्लॉट न.डब्लू ३२,३३,३४ या कंपनीला शुक्रवार (दि.२२) सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठी आग लागली.या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र कुरकुंभ येथील विविध कंपनीतून जमा केलेल्या रसायनावर प्रक्रिया करून मिथेनाँल, अँसीटोन, झायलीन वेगळे करण्याची प्रक्रिया या कंपनीत केली जात होती.

या आगीचे प्रमाण मोठ्या स्वरुपात असल्याने काही काळ नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दलासह विविध कंपनींच्या सुरक्षा अधिकारी व यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले मात्र संपूर्ण रसायने जळून गेल्यावरच सुमारे तीन तासानंतर आग विझली.
कुसुम डिस्टीलेशनमध्ये विविध कंपनीत रासायनीक प्रक्रियेत वापरले जाणारे रसायन एकत्र करून त्यापासून विविध रसायने वेगळे करण्याची प्रक्रिया करण्यात येत होती. मोठ्या प्रमाणात रसायनांनी भरलेले ड्रम ठेवले होते.सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आढळून येत आहे. या घटनेने लघु उद्योगांना देखील सुरक्षेच्या उपाययोजना बाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक होणार आहे.

या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे.आगीचे व धुराचे लोट उंच आकाशातून जवळपास सात किलोमीटर दूरवर दिसून येत असल्याने परिसराच्या गावातील नागरिकांनी घाबरून कुरकुंभ येथील ओळखीच्या ग्रामस्थांना फोन करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले.रसायनाने भरलेले ड्रम जसजसे पेट घेत होते तशा मोठ्या प्रामाणात आगीचे प्रमाण वाढत होते.
कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील या घटनेचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या जीवनमानावर होत असल्याने दौंड,मळद,जिरेगाव,गिरिम,पाटस इत्यादी जवळपास असणाऱ्या गावातील नागरिक चिंतीत होते. मात्र पोलीसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवुन नागरिकांना यापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, सिप्लाचे सुरक्षा अधिकारी दिलीप भागवत व इतर विविध प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.

कुरकुंभ सारख्या रासायनीक प्रकल्पातील सुरक्षा उपाय योजना आणखी समृद्ध करणे आवश्यक असुन याबाबत जबाबदार यंत्रणांनी वेळीच खबरदारी घेऊन याबाबत पावले उचलणे गरजेचे आहे.याबाबत महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र देखील देण्यात आले आहे.
-राहुल भोसले,सरपंच कुरकुंभ.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version