गोल पोस्ट महाराष्ट्र राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत लक्ष्मण माळी प्रथम तर डॉ.स्मिता गिरी द्वितीय

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत लक्ष्मण माळी प्रथम तर डॉ.स्मिता गिरी द्वितीय

कोल्हापूर, ८ सप्टेंबर २०२३ : निर्मिती फिल्म क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वव्यापी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन, कार्य आणि विचारांवर आधारित भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सोलापूर येथील लेखक व विचारवंत लक्ष्मण माळी यांचा प्रथम क्रमांक तर कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका डॉ. स्मिता गिरी यांचा द्वितीय क्रमांक आला आहे.

या नावाजलेल्या निबंध स्पर्धेमध्ये राज्यभरातून पाचशेहून अधिक निबंध स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांचा ज्वलंत, वास्तववादी व सामाजिक क्रांतीचा इतिहास समजून घेण्यासाठी, त्यांचे समग्र विचार, तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी आणि महामानवांच्या विचारांचा जागर करण्यासाठी या महाराष्ट्र व मराठी भाषेतील सर्वात मोठ्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वव्यापी छत्रपती शाहू महाराज या निबंध स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस दोन लाखाचे असून त्यामध्ये पंचवीस हजार रोख आणि एक लाख पंच्याहत्तर हजारांची पुस्तके असे स्वरूप, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस स्वरूप एक लाख रुपयांचे असून त्यात दहा हजार रोख आणि नव्वद हजारांची पुस्तके आहेत. या स्पर्धेचे बक्षीस वितरण २ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२:०० वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी होणार असून या बक्षीस वितरण समारंभास स्पर्धकासह शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, समन्वयक नामदेव मोरे व अरहंत मिणचेकर यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version