अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महाप्रसाद सेवा सुरु- जन्मेजय भोसले

अक्कलकोट, २० नोव्हेंबर २०२० : राज्यातील मंदिरे व प्रार्थना स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्याप्रमाणे सगळ्यांचे श्रध्दास्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात देखील स्वामी भक्तांना कोरोना बाबतचे सर्व ते नियम कटाक्षाने पाळत महाप्रसाद दिला जात आहे. मंडळाने महाप्रसाद सुरु केल्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

अन्नछत्र मंडळाकडून दि.१५ मार्च पासून अन्नदान सेवा पूर्णपणे स्थगित केली हाेती. गेल्या आठ महिन्यापासून सर्व कामकाज ठप्प होते. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महाप्रसाद सेवा सुरु करण्यात आलेली आहे.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसापासून सुरु करण्यात आलेल्या महाप्रसाद सेवेला सुरुवात करण्यात आलेले आहे.

मात्र महाप्रसाद घेण्याकरिता येणार्‍या भाविकांत सामजिक अंतर, थर्मल गन चेकींग, मास्क व सॅनिटायझर करुनच महाप्रसाद गृहात प्रवेश दिला जात असून महाप्रसाद गृहालगत बफे पध्दतीने महाप्रसाद दिला जात आहे. महाप्रसाद गृहात सामाजिक अंतर ठेवून स्वामी भक्तांना महाप्रसाद दिला जात आहे.
अत्यंत चांगल्या पध्दतीने शासनाची योजना अन्नछत्र मंडळाकडून राबविली जात आहे. ही योजना राबविण्याकामी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे स्वत: लक्ष ठेवून आहेत.

न्यासाचे पदाधिकारी सेवेकरी, कर्मचारी देखील सर्व ते नियम पाळत स्वामी भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.महाप्रसाद घेण्यासाठी स्वामीभक्त हे रांगेत सर्व ते नियम पाळत उभे राहून टप्प्या-टप्प्याने सामाजिक अंतराने महाप्रसाद घेण्यासाठी प्रसाद गृहात सोडले जात आहे. अन्नछत्र मंडळ सुरु झाल्याने स्वामी भक्तांची चांगली सोय झाली आहे. मंडळाने कोरोनाच्या बाबतीत केलेल्या उपाय योजनेबाबतचे सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.

श्रीक्षेत्रे अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी व भाविकांची आकर्षणाची ठिकाणी असलेल्या न्यासाच्या परिसरातील शिवसृष्टी, शिवचरित्र, धातूशिल्प प्रदर्शन, भव्य कारंजा, श्री स्वामी समर्थ वाटिका, बालोद्यान, दिपमाला, कपिला गाय, श्री स्वामींची ३० फूटी उभी मूर्ती, सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हे देखील शासनाने कोरोनच्या बाबतीत घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत सुरु करण्यात येणार आहेत.
दरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अन्नदानाची स्वामी सेवा गेल्या ८ महिन्यापासून पूर्णपणे स्थगित असताना हे न्यास शहरातील गरिब, निराधार, निराश्रितांना असे १ हजार जणांना जेवण दिल्याचे कार्य करीत आहेत.

शासनाने अन्नछत्राच्या यात्री निवास इमारतीत कोवीड सेंटर सुरु केले होते. या ठिकाणी सलग ५ महिने २०० पॉझिटिव्ह रुग्णांना दररोज चहा, नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण दिले होते. येथील लोेकांच्या तक्रारीने कोवीड सेंटर अन्यत्र हलविले पण त्यासाठी शासनाने ५० बेड, गाद्या, उशा बेडशीट आदींची मागणी केली व सदरची पूर्तता न्यासाने केलेली होती. तसेच ससुन हॉस्पिटल पुणे यांना व्हेंटीलेटरसाठी २ लाखांची देणगी दिली. तसेच शहर व ग्रामीण भज्ञगात निर्जंतुकीकरण औषध फवारणीचे कार्य सातत्याने सुरुच होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा