Police Attacks in Maharashtra: राज्यात कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. पण तेच सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या तीन वर्षात राज्यात पोलिसांवर २ हजार ४१० हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक घटना मुंबई आणि ठाण्यात घडल्या आहे. त्यामुळे पोलिसांना जनतेचे संरक्षण करण्याआधी स्वत:चे संरक्षण करणे बंधनकारक झाले आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर मध्ये २ पोलिसांवर हल्ला झाला. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला. गुन्हेगार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि अवैद्य धंदे करणारे लोक प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांसमोर अडथळे आणून त्यांच्यावर दबाव टाकत असतात. पोलिस महासंचालकाने आदेश देऊन सुद्धा या घटना थांबल्या नसल्याचे चित्र चंद्रपुर घटनेवरुन सिद्ध झाले आहे.
याशिवाय सर्वाधिक घटना या मुंबईमध्ये आणि ठाण्यात घडल्या असून मुंबईत (४४८) तर ठाण्यात (१६१) घटणांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड (१०८) शहराचा नंबर लागतो. याशिवाय पुण्यात (९९) , नागपुर (६२) नवी मुंबई (६९), वसई- विरार ( ६४), छत्रपती संभाजीनगर (५९) हल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जर कायदा व सुव्यवस्था यांच्याच सुरक्षेवर गदा येत असेल तर सामान्य जनतेने अपेक्षा कोणाकडून ठेवायच्या. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर