खुशखबर! आता तीन महिन्यांचं रेशन एकाच वेळी मिळणार, पावसाळ्यातील गैरसोय टळणार

18
Three months ration distribution Maharashtra
पावसाळ्यातील गैरसोय टळणार;

Three months ration distribution Maharashtra: पावसाळा आणि संभाव्य पूरस्थितीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यामध्येच ऑगस्टपर्यंतचं म्हणजेच तीन महिन्यांचं धान्य एकाच वेळी मिळणार आहे! जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपलं हक्काचं धान्य एकत्रित घेऊन जावं.

केंद्र सरकारने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पावसाळ्यात धान्य वाहतुकीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत ऑगस्टपर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल करून वाटप करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, रेशन दुकानदारांकडून सध्या धान्याची उचल जलद गतीने केली जात आहे.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशनचे खजिनदार, विजय गुप्ता यांनी या निर्णयाचं स्वागत करत सांगितलं की, “शासनाने तीन महिन्यांचं धान्य जून महिन्यात वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार धान्य वाटप करण्याची दुकानदारांची जबाबदारी आहे. धान्य साठवण्यासाठी आणि योग्य पद्धतीने वाटप करण्यासाठी दुकानदार नियोजन करत आहेत.”

सध्या रेशन दुकानदारांकडे जून महिन्यातील धान्याचा साठा उपलब्ध झाला आहे आणि पहिल्या टप्प्यात जूनमधील धान्य वाटप सुरू होईल. त्यानंतर, १५ जूनपर्यंत पुढील महिन्याचं धान्य उपलब्ध झाल्यास, त्याच्या वाटपाचंही नियोजन करण्यात येणार असल्याचं दुकानदारांकडून सांगण्यात आलं आहे. या निर्णयामुळे नागरिकांना पावसाळ्यात भिजत रेशनसाठी वाट पाहावी लागणार नाही आणि त्यांची मोठी गैरसोय टळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे