गोल पोस्ट महाराष्ट्र साताऱ्यातील मराठा समाजाचे साखळी उपोषण पोलीसांच्या उपस्थितीत स्थगित

साताऱ्यातील मराठा समाजाचे साखळी उपोषण पोलीसांच्या उपस्थितीत स्थगित

सातारा २६ डिसेंबर २०२३ : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील सभेत महाराष्ट्रातील मराठा बांधवांना साखळी उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले आणि जानेवारीत चलो मुंबई चा नारा दिला. दरम्यान २० जानेवारीला मुंबईत होणाऱ्या महामोर्चासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जरांगे यांनी केलं आहे. त्यांच्या आवाहनानंतर साताऱ्यातील मराठा समाजाचे साखळी उपोषण पोलिसांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आले आहे. या वेळी मराठा बांधवांनी राजधानी साताऱ्यातून लाखोंच्या संख्येने मुंबईला जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दरम्यान मुंबई मधे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधवांनी उपस्थित राहून सरकारला मराठा आरक्षणावर लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे असे येथील समन्वयकांनी सांगीतले. दरम्यान मनोज जरांगे पाटलांच्या केलेल्या आवाहनानंतर साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मराठा समाजाचे साखळी उपोषण मराठा समन्वयकांनी स्थगित केले.

साताऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईला जाणार आहेत. त्या वेळी घरातील प्रत्येक व्यक्ती सोबत घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे आणि जो पर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मुंबई मधून हटणार नाही असे मराठा बांधवांकडून सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

error: Content is protected !!
Exit mobile version