आम्हाला हिंदीत नोकरांची भुमिका-अशोक सराफ…!

Marathi Actor Ashok Saraf Speaks Out on Bollywood
आम्हाला हिंदीत नोकरांची भुमिका;

Marathi Actor Ashok Saraf Speaks Out on Bollywood: अशोक सराफ हे मनोरंजन क्षेत्रातले सर्वांचे लाडके अभिनेते आहेत.आत्ता महाराष्ट्र भुषण या पुरस्काराबरोबरच अशोक सराफ यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.गेली कित्येक वर्ष त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. एक सो एक भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. कधी विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवलं तर कधी तितकीच गंभीर भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांना विचार करायला भागही पाडलं. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी नाव कमावलं. पण, हिंदीत कायमच दुय्यम भूमिका त्यांच्या वाट्याला आली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारण त्यांनी सांगितलं.

करण अर्जुन, ‘कोयला, जोरू का गुलाम, सिंघम, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘गुप्त’ अशा हिंदी सिनेमांमध्ये अशोक सराफ दिसले. मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या नटाच्या वाट्याला बॉलिवूडमध्ये हिरोची भूमिका आली नाही. हिंदी सिनेमात हिरोच्या भूमिकेत ते का दिसले नाहीत, यामागचं कारण एका दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी सांगितलं.

“मराठी लोकांची इमेज ही हिंदीत बसत नाही. त्यांच्या दृष्टीने हिरो म्हणजे गोरा पान… तो काम काय करतो हे कोणाला माहीत नसतं. आणि कोणाला कळतंही नाही. तसे तर आपण दिसत नाही. त्यामुळे आपल्याला हिरोचे रोल कधी मिळणार नाही. मग आपण कॅरेक्टर शोधतो. माझ्यासारख्या किंवा लक्ष्मीकांत सारख्या चेहऱ्याला मग नोकराची भूमिका मिळते. त्याशिवाय काही मिळतच नाही. आता ते करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं. जर तुम्हाला ते चांगले पैसे देत असतील आणि जर तुमचा फायदा होत असेल तर काहीच हरकत नाही. पण, लोक काय म्हणतात यात अर्थ नाही. तिथे आम्ही हिरो म्हणून काम करणं हे होऊच शकत नाही. मग आम्ही कशाला हट्ट धरायचा”.

न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर