राज्यात पारा आणखीन वाढणार… हवामान खात्याचा इशारा, काही भागात पावसाची शक्यता

मुंबई, 18 एप्रिल 2022: राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा परिणाम ठीक ठिकाणी पाहायला मिळतोय. राज्यातच काय तर देशात आणि ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा परिणाम पाहायला मिळतोय. काही ठिकाणी मृत्यूची नोंद देखील करण्यात आलीय. अशातच आता भारतीय हवामान खात्याने विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची शक्यताही वर्तविण्यात आलीय.

हवामान खात्याकडून राज्यभरात तापमानवाढीचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार विदर्भात 18 ते 20 एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट येणार आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर पावसाची शक्यता आहे. शनिवारी चंद्रपुरात राज्यातलं सर्वाधिक म्हणजेच 44अंश तापमान होतं. तर त्याच काळात म्हणजे 19 एप्रिलनंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. वर्धा, अकोला, नागपूरमधलं तापमान 42 ते 43 अंशांवर आहे. मराठवाड्यात 42अंश, तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सोलापुरात ते 40 ते 41 अंशांवर आहे.

हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर राज्यातलं कमाल तापमान आणखीन वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय. यामागचं कारण म्हणजे वायव्य भारतात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. तिथं तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याने विदर्भात 18 ते 20 एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा