मुंबई, ४ एप्रिल २०२१: राज्यातील वाढत्या कोरोना लक्षात घेता कोरोनासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. या सर्व सूचना सोमवारी रात्री ८ वाजेपासून अंमलात आणल्या जातील. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्यांनाच रात्री सोडण्याची परवानगी दिली जाईल. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खाण्यावर बंदी आहे. तथापि पॅकिंग सुविधा चालू राहील. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व उद्याने बंद राहतील. त्याचबरोबर थिएटरही बंद राहतील. न्यायालयाचे असे निर्देश आहेत की, कुठल्याही मोठ्या शूटला परवानगी देण्यात येणार नाही. त्याचबरोबर लवकरच उद्योगासाठी एसओपी देण्यात येईल.
कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराची गती पुन्हा वाढली आहे. देशात येणाऱ्या एकूण नवीन प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक एकट्या महाराष्ट्रात आहेत. ३ एप्रिल रोजी महाराष्ट्रात ४९,४४७ नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि त्यात २७७ लोकांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनाचे ४ लाख १ हजार १७२ सक्रिय प्रकरणे आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही राज्यातील कोरोनाच्या चिंतेवर फोनवर चर्चा केली.
काय बंद काय चालू
अत्यावश्यक सोडून सर्व दुकाने रात्री ८ नंतर बंद होतील. सर्व मॉल, बार बंद राहतील, अत्यावश्यक सोडून सर्व दुकाने बंद होतील, अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
वाहतूक व्यवस्था
राज्याक कडक निर्बंध असले तरी वाहतूक व्यवस्था सुरुच राहणार आहे. कोणतीही वाहने बंद होणार नाहीत. मुंबई लोकल सुरु राहणार आहे. बस, रिक्षा, टॅक्सी सुरु राहणार, पण त्यांच्या प्रवासी क्षमतेवर बंधन असेल. रिक्षामध्ये १ आणि दोन पॅसेंजर, म्हणजे ५० टक्के क्षमतेने सर्व वाहने सुरु राहतील.
जिल्हाबंदी नाही
राज्यात वीकेंड लॉकडाऊन जाहीर झाला आहे. शुक्रवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लॉकडाऊन असेल. मात्र जिल्हाबंदी नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. लॉकडाऊन कोणालाच नको होता, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
मास्क न लावल्यास आता ५०० रुपये दंड
याबाबत बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ” राज्यात टाळेबंदी नाही, जर लॉकडाऊन होणार असेल तर ३ दिवस आधी सांगण्यात येईल. सध्या वीकेंड लॉकाडऊन आहे. याशिवाय ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून रात्री ८ ते सकाळी ६ पर्यंत सर्व बंद राहील. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येदेखील काही बदल होतील. मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल”
यापुढे डोळेझाक केली जाणार नाही, नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. राज्यात शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन राहील.
खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’
खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सक्ती करण्यात आली आहे. केवळ बँक, विमा आणि मेडिक्लेमसारखी कार्यालये सुरु राहतील. याशिवाय सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीत कामं सुरु राहतील.
असा असेल लॉकडाऊन
- उद्या रात्री ८ वाजेपासून नियमावली लागू
- रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी
- मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू
- सरकारी कार्यालय ५० टक्के क्षमतेनं काम करणार
- इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही
- बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार
- भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय
- शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार
- सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, बस, रेल्वे, टॅक्सी बंद राहणार नाहीत, पण त्यांच्यातील प्रवासी क्षमता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा ५० टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे