गोल पोस्ट इतर राजकारण “मोदी सरकारचा विचार कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण”… राहुल गांधी

“मोदी सरकारचा विचार कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण”… राहुल गांधी

नवी दिल्ली, ५ सप्टेंबर २०२०: काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीतील जोरदार पराभवानंतर राजकारणापासून लांब राहणेच पसंत करत होते मात्र आता गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय होऊन आता मोदींवर व सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांमध्ये जीएसटी, नोटबंदी, रोजगार यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयातील नव्या नोकर भरतीवरील स्थगितीवर बोलताना मोदी सरकारला सरकारी कार्यालयं कायम वेतनावरील कर्मचारीमुक्त करायचे असल्याचा आरोप केला.

राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकारचा विचार ‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ असा आहे. कोव्हिड फक्त निमित्त आहे. मोदी सरकारला सरकारी कार्यालयांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांपासून मुक्त करायचं आहे. त्यांना युवकांचं भविष्य खराब करुन आपल्या मित्रांनाच पुढे न्यायचं आहे. देशातील १२ कोटी रोजगार गेले आहेत. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कुठेच दिसेना. सामान्य नागरिकांचं उत्पन्न गायब आहे, देशाचा विकास आणि सुरक्षा देखील कुठेच दिसेना, प्रश्न विचारले तर उत्तरं गायब आहेत.” मोदी सरकारने नोकर भरतीच्या परीक्षांचे निकाल आणि तरुणांच्या प्रश्नांवरील उपाय जनतेला द्यावेत, अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

“२०१६-१८ या काळात ५० लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. मग फायदा कुणाला मिळाला? याचा फायदा भारतातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांना मिळाला. तुमचे पैसे तुमच्या खिशातून, तुमच्या घरातून काढून त्याचा उपयोग या अब्जाधीशांचं कर्ज माफ करण्यासाठी केला. ५० मोठ्या उद्योगपतींचे जवळपास 68 हजार ६०७ कोटी रुपये माफ करण्यात आले. शेतकरी, कामगार आणि छोट्या दुकानदारांचा एकही रुपया माफ केला नाही. ते त्यांचं केवळ एक उद्देश होतं. नोटबंदीमागे त्यांचा लपलेला दुसरा उद्देश देखील होता,” असं राहुल गांधी म्हणाले

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version