मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस २७ जूनपासून धावणार, पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

मुंबई २५ जून २०२३: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोकार्पणाचा ३ जून रोजिचा कार्यक्रम, ओडिशातील रेल्वे अपघातामुळे रद्द झाला होता. पण आता ओडिशातील अपघातामुळे रेड सिग्नल मिळालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ही कोकणवासियांसाठी आता आनंदाची बातमी आहे. वंदे भारत एक्सप्रेसची सर्व कोकणवासीय प्रतिक्षा करत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली असुन त्यांचा आता जलद प्रवास वंदे भारत एक्स्प्रेसमुळे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जून रोजी मुंबई-गोवा गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. महाराष्ट्रातून सुरु होणारी ही चौथी गाडी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यात गोवा-मुंबईसह पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या गाडींचा समावेश आहे. या पाच नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यावर देशातील वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या २३ होणार आहे. या गाड्या आरामदायी आहेत आणि आधुनिक सुविधायुक्त आहे. यामुळे वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना प्रवाशांकडुन मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे बुकींग अजून सुरु झाले नाही. या गाडीमध्ये एससी चेअरकार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे एकूण आठ डबे आहेत. तिचे चेअर कारचे प्रवास भाडे ११०० ते १६०० दरम्यान असण्याची शक्यता आहे, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे २२००-२८०० च्या दरम्यान असणार आहे.

मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर (शिर्डी) अशा तीन वंदे भारत एक्स्प्रेस यापूर्वी राज्यात सुरु आहेत. पहिली गाडी मुंबई ते गांधीनगर सुरु झाली. या सर्व गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असुन आता चौथी गाडी सुरु होणार आहे. त्याचा फायदा कोकणवासीयांना होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा