मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट

मुंबई, २५ जुलै २०२३ : एकीकडे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गेल्या रविवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. त्याचवेळी येथील अनेक उपनगरात सोमवारी दुपारपर्यंत जोरदार पाऊस सुरू होता. तर आज म्हणजेच मंगळवारी मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईसह ठाणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच या आठवड्यातही पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

सोमवारी सकाळी मुंबईच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. दुसरीकडे, बोरिवली अग्निशमन दल, बोरिवली प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, कांदिवली, ठाणे जिल्ह्यातील कौस, खर्डीपाडा, कल्याण-डोंबिवली विभागातील काही केंद्रांवर ४० ते ५० मिमी दरम्यान पाऊस झाला आहे. सोमवारी मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला होता.

आज आणि उद्या बुधवारपर्यंत मराठवाडा, परभणी, हिंगोली येथे एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच नांदेड, लातूर जिल्ह्यांत येत्या गुरुवारपर्यंत एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. यासोबतच शुक्रवारपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे बुधवारी चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली, तर गुरुवारी भंडारा आणि गोंदियामध्ये ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा