पराभवाच्या भितीनेच मुंबई विद्यापीठाची निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरे

मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भित्रे आहेत. पक्ष फोडून, एक घर फोडून तसेच महाशक्तीसोबत असतानाही कोणत्याही प्रकारची निवडणूक घ्यायला, हे सरकार घाबरत आहे. त्यामुळेच मुंबई विद्यापीठाच्या निवडणूका अचानक स्थगित करण्यात आल्या आहेत. सिनेटच्या दहाजणांकडून हे सरकार काही पडणार नव्हते. तुमचे सरकार आम्हीच पाडणार आहे, असे आव्हान यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले.

मुंबई विद्यापीठाने अधिसभा अर्थात सिनेट निवडणूक स्थगित केल्याने राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सध्या केवळ नेमणुका करून कारभार चालविला जात आहे. विद्यापीठात ११ राज्यपाल नियुक्तांची नोंदणी झालीय.

प्राध्यापक गटांच्या नेमणुकाही झाल्या. मात्र निवडणूक स्थगित झाल्याने पदवीधरांचा आवाज विदयापीठात नसेल. घटनाबाह्य सरकार तर आम्हीच पाडणार आहोत. पदवीधर मतदार आपल्याला नाकारेल या भितीनेच निवडणूका रद्द करण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या स्थगितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबाव होता का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा