दरवर्षी अतिवृष्टी आणि धरणातील विसर्गामुळे मुठा नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा फटका बसतो. एकतानगर, विठ्ठलनगर आणि निंबजनगर या भागातील नागरिकांसाठी हा त्रास आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेने पुढाकार घेत वडगाव खुर्द ते राजाराम पूल दरम्यान मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तब्बल ३६९ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला असून त्याला पूर्वगणना समितीची हिरवी झेंडी मिळाली आहे.
गेल्या दोन वर्षांत सलग पुरामुळे अनेक सोसायट्या, दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपत्ती व्यवस्थापन निधीतून ३०० कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. निधी मिळताच कामाला सुरुवात होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पामुळे नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात पूरस्थितीला कायमचा आळा बसेल अशी अपेक्षा आहे. यामुळे केवळ पूरग्रस्त वस्त्यांचा त्रास कमी होणार नाही तर पुण्याच्या विकास आराखड्यालाही बळकटी मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































