एवढीच सहानुभूती असेल तर मग भाजपने शरद पवारांना पंतप्रधान करावे, नाना पटोले यांचा भाजपला सल्ला

17

नाशिक, ९ ऑगस्ट २०२३ : काँग्रेसमुळे शरद पवार पंतप्रधान झाले नाही, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मोदी यांना पवारांबाबत इतकी सहानुभूती असेल तर भाजपने त्यांना पंतप्रधान करावे, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. आज नाशिक दौऱ्यावर आलेल्या पटोले यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू आहे. त्यावर पंतप्रधान बोलत नाही. ते केवळ राजकीय भाषणबाजी करत द्वेषातून बोलतात. देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह महागाईबाबत त्यांनी चुप्पी साधली आहे. आता मोदींची मन की बात ही कोणी ऐकण्यास तयार नाही. मणिपूर हिंसाचारप्रकरणी पंतप्रधानांनी मौन धारण करणे हे दुर्दैवी आहे.

निवडणुका आल्या की भाजपच्या सर्व्हेक्षणांना पेव येतो. जनतेच्या कोर्टात जेव्हा चेंडू येतो. तेव्हा ते योग्य निर्णय घेत असल्याचे कर्नाटक निवडणूकीतून समोर आले आहे. या पूर्वीही लोकांनी सर्व्हे पलटवले आहे. सध्या जनतेच्या मनात काँग्रेस असून, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सत्तांतर होईल, असे भाकीत पटोले यांनी वर्तवत मुख्यमंत्र्यांकडून डिनर संदर्भात निरोपाचे खंडन केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर