गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय नेपाळ भारत विवादात पाकिस्तानने घेतली उडी

नेपाळ भारत विवादात पाकिस्तानने घेतली उडी

पाकिस्तान, दि. २७ मे २०२०: भारत आणि नेपाळ सीमा वादात आता पाकिस्तान ने उडी घेतली आहे. भारत शेजारील देशांच्या बहाण्याने आता इम्रान खान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी पुन्हा पुन्हा त्यांनी कश्मीर मुद्द्याचे रडगाणे गाणे सुरुवात केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लिहिले की, हिंदुत्ववादी मोदी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण विस्तारित धोरणांद्वारे शेजारी देशांसाठी भारत धोकादायक बनला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नेपाळ-चीन सीमा विवादातून भारत बांगलादेशला धोका दर्शवित आहे. त्याचवेळी पाकिस्तानविरूद्ध खोट्या गोष्टी पसरवत भारत सर्वांसाठीच अडचणी निर्माण करत आहे.

यावेळी बोलताना इमरान खान कश्मीर वरून रडगाणे गाणे विसरले नाहीत. ते पुढे म्हणाले की, “भारत कश्मीर वर अवैद्य कब्जा घेऊन बसला आहे तसेच पाकिस्तानच्या बाजूकडील कश्मीरवर देखील आता दावा करत आहे. इतकेच नव्हे तर जिनेव्हा कराराअंतर्गत युद्ध अपराध्याला वाव देत आहे. मी नेहमीच म्हणत आलो आहे की की मुस्लिमांना दुय्यम दर्जा देणे आणि भारतामध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार करणे यामुळे या भागातील शांतता भंग होत आहे.

वस्तुतः ८ मे रोजी भारताने लिपुलेखमधून जात असलेल्या कैलास मानसरोवर लिंक रोडचे उद्घाटन केले, यावर नेपाळने निषेध नोंदविला होता. नेपाळने उत्तराखंडच्या कालापाणी आणि लिंपियाधुरा वर आपला हक्क सांगितला असून या तिन्ही क्षेत्राचा एक नवीन नकाशा देखील जाहीर केला आहे.

नेपाळने नोंदवलेल्या या निषेधावर भारताने प्रतिक्रिया देत असे म्हटले होते की, लीपू लेख येथे झालेल्या रस्त्याचे बांधकाम हे भारतीय हद्दीमध्ये झाले होते. तरीसुद्धा भारत हा विवाद चर्चेतून सोडवण्यास तयार आहे. आधी दोन्ही देशांनी कोरोनाव्हायरसच्या संकटाशी एकजुटीने सामना करायला हवा त्यानंतर आपण या मुद्द्यावर बोलूयात.

भारताचे लष्कर प्रमुख नरवणे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, नेपाळच्या असा वागण्यामागे दुसरा कोणाचा तरी हात असला पाहिजे. नरवणे यांचा इशारा हा चीनकडे होता. याचबरोबर चीन देखील आता गेल्या काही दिवसांपासून लडाख मधील काही भागांमध्ये सीमावाद करण्याचा प्रयत्न करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version