मागच्या सहा महिन्यात सीमेवर झाली नाही घुसखोरी: गृह मंत्रालय

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२०: एलएसीबाबत चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत सांगितलं की, गेल्या सहा महिन्यांत भारत-चीन सीमेवर कोणतीही घुसखोरी झाली नाही. राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल अग्रवाल यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना माहिती दिली. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० मधील तरतुदी हटवल्यानंतर खोऱ्यात कोणतीही मोठी घटना घडलेली नाही.

आपल्या उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले की, यावर्षी आतापर्यंत दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या वतीनं जम्मू-काश्मीरमध्ये ४७ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात एकही घुसखोरी झाली नव्हती, मार्चमध्ये घुसखोरीचे ४ प्रयत्न, एप्रिलमध्ये घुसखोरीचे २४ प्रयत्न, मेमध्ये ८ वेळा, जूनमधील एकाही घटना घडल्या नव्हत्या तर घुसखोरीच्या या घटना जुलै महिन्यात ११ पर्यंत वाढल्या.

ते म्हणाले की, ५ ऑगस्ट २०१९ पासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. खोऱ्यात ५ ऑगस्टपूर्वी म्हणजेच २९ जून २०१८ ते ४ ऑगस्ट २०१९ पर्यंत दहशतवादी हल्ल्यांच्या ४५५ घटना घडल्या आहेत, तर ५ ऑगस्ट २०१९ ते ९ सप्टेंबर २०२० पर्यंत २११ दहशतवादी हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत.

केंद्रीय गृह राज्यमंत्री डॉ किशन रेड्डी म्हणाले की एनआयएच्या तपासणीत केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेट (आयएस) सर्वात जास्त सक्रिय असल्याचं दिसून आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा