भारतातील उद्योगाचे नवीन ठिकाण म्हणून ईशान्य विभाग उदयास येईल : डॉ जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, दि. ६ जून २०२०: देशाचा ईशान्य विभाग हळूहळू पण दृढतेने भारतातील उद्योगाचे नवीन ठिकाण म्हणून उदयास येत आहे असे केंद्रीय ईशान्य विभाग विकास राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री असेलेले डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. कोविडनंतर अर्थव्यवस्था, व्यापार, वैज्ञानिक संशोधन आणि इतर अनेक विविध क्षेत्रांत संभाव्य नवीन संधी उदयास येतील आणि देशाचा ईशान्य भाग आर्थिक केंद्र म्हणून ओळखला जाईल आणि स्टार्टअप्सच्या पसंतीचे ते ठिकाण असेल असे ते म्हणाले.

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम पॉलिसी रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस सेंटर आणि आयआयएम शिलाँग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ई-सिम्पोसिया २०२० च्या उदघाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सिंह बोलत होते. डॉ. सिंह म्हणाले कि गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारच्या काळात ईशान्येकडील प्रदेशाने भूतकाळातील कित्येक त्रुटींवर विजय मिळविला कारण देशाच्या इतर प्रदेशांच्या तुलनेत प्रथमच या प्रदेशाकडे समान लक्ष देण्यात आले. यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास वाढण्याबरोबरच भारताच्या इतर प्रदेशांसह तसेच बाहेरील देशांशीही वेगवेगळ्या पातळीवर काम करण्याची क्षमता वाढली आहे.

भूतकाळात सर्वसमावेशक विकासाकडे आधीच्या सरकारांनी दाखविलेल्या निरिच्छेवर तीव्र नापसंती व्यक्त करीत डॉ. सिंह यांनी या प्रदेशाच्या सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासासाठी सध्याच्या सरकारने घेतलेल्या पुढाकारांवर प्रकाश टाकला. कनेक्टिव्हिटीच्या (संपर्काच्या) समस्येवर मात करणे असो किंवा प्रदेशातील उद्योजकांना प्रोत्साहन देणे असो, हे सरकार सर्व संभाव्य मदत आणि पाठबळ देण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे असे त्यांनी सांगितले.

डॉ. सिंह यांच्या अगोदर ईशान्य विभाग विकास मंत्रालयाचे सचिव डॉ. इंद्रजित सिंह, ईशान्य परिषदेचे सचिव मोझेस के चालाई, आयआयएम शिलाँगच्या राज्यपाल मंडळाचे अध्यक्ष शिशिर बाजोरिया, आयआयएम शिलाँगच्या राज्यपाल मंडळाचे सदस्य अतुल कुलकर्णी, आयआयएम शिलाँगचे संचालक प्राध्यापक डी पी गोयल आणि प्रा. केया सेनगुप्ता यांनी या प्रसंगी प्रदेशातील धोरणात्मक आणि विकासाच्या आवश्यकतेची व्याप्ती व त्यांची गरज अधोरेखित केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा