२७ महिन्यांनंतर ७ दिवसांसाठी उमर खालिद तिहार तुरुंगातून बाहेर; ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली, २३ डिसेंबर २०२२ दिल्ली दंगलीत मोठा कट रचल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या उमर खालिदच्या बहिणीचे लग्न ठरले असल्याने उमर खालिदला तब्बल २७ महिन्यांनंतर ७ दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

उमरने दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला होता. ही याचिका ग्राह्य धरून न्यायालयाने त्याला आठवडाभरासाठी जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, न्यायालयाचा आदेश मिळताच, आज (शुक्रवार) सकाळी त्याची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली.

तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोर्टाकडून एक आठवड्याचा जामीन मिळाला आहे. उमर खालिदला २३ डिसेंबरला सकाळी ७ वाजता तिहारमधून सोडण्यात आले. बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्याला हा जामीन मिळाला. जामिनाच्या अटींनुसार, उमरला ३० डिसेंबरला परत तुरुंगात यावे लागणार आहे.’

जरी खालिदला जामीन मिळाला असला तरी, त्यांच्यासमोर अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये तो कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क साधू शकणार नाही. याशिवाय, तो पुराव्यांशी छेडछाडही करणार नाही. खालिदला त्याचा फोन नंबर तपास अधिकाऱ्यांना द्यावा लागणार असून अंतरिम जामीन मिळेपर्यंत तो क्रमांक चालू राहील. शिवाय, उमर दररोज तपास अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल करेल.

फेब्रुवारी २०२० मध्ये सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात ईशान्य दिल्लीत हिंसाचार उसळला होता. या दंगलीत ५३ लोकांचा मृत्यू झाला, तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी उमरला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. तो गेल्या २७७ महिन्यांपासून तुरुंगात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा