दौंड, दि.५ मे २०२० : जगभरात कोरोनाच्या पार्शभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनचा भयंकर परिणाम येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. देश भरात जवळपास सर्वच उद्योग बंद असताना अत्यावश्यक सेवेतील औषध निर्मितीला परवाना असताना देखील कामगारांच्या अभावी हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
लाखोंच्या संखेने कामगार सध्या बेरोजगार झाले असून जीवनावश्यक वस्तुंच्या उपलब्धते अभावी आपापल्या राज्यात जाण्यासाठी पायी चालत व मिळेल त्या साधनांचा वापर करीत आहेत. मात्र कुरकुंभ सारख्या ठिकाणी रोजगार उपलब्ध असून देखील भीतीच्या वातावरणाने कामास जाण्यास नकार देत आहेत.
सध्या कुरकुंभ परिसरात जवळपास पाच ते सात हजार कामगार आहेत.औषध निर्मितीच्या अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या प्रकल्पातील काम सुरु असून व अन्य सर्व प्रकारच्या सुविधा मिळून देखील त्यांना आपल्या राज्यात परत जाण्याचे वेध लागले आहेत. माघारी जाण्यासाठी सोय उपलब्ध होत नसल्याने अनेक कामगार कामावर न जाताच घरी राहत आहेत. त्यामुळे या औद्योगीक क्षेत्रावर व परिणामी औषध निर्मिती करणाऱ्या प्रकल्पावर प्रकल्प सुरु ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यातून येणाऱ्या काळात मोठ्या प्रकारची बेरोजगारी व आर्थिक संकट उभे राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातच हजारोच्या संखेने कामगारांनी पलायन केले होते.मात्र ज्यांना जाण्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत असे कामगार सध्या कुरकुंभ व परिसरात आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारच त्रास नसताना फक्त घरच्या व्यक्तींच्या आग्रहाखातर माघारी जाण्याचा निर्णय घेत आहेत.सध्या कोणत्याही प्रवासावर बंदी असल्याने व पुणे जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने यावर अनेक निर्बंध येत आहेत. परप्रांतात जाण्यासाठी किचकट ऑनलाईन प्रक्रिया पार पाडावी लागत असल्याने या गोंधळात आणखी भर पडत आहे तर दुसरीकडे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शेकडो कामगार प्राथमीक आरोग्य केंद्राकडे धाव घेत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख












































