कल्याण, २८ ऑगस्ट २०२०: अंतिम वर्षांच्या परिक्षांबाबत न्यायालयाच्या निर्णयाला विद्यार्थी भारतीच्या संघटने कडून विरोध केला आहे. कल्याणच्या तहसीलदार ऑफिसला भेट देत निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे , अन्यथा आंदोलन करू असे सांगितले आहे. तहसीलदार ऑफिसला भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्यांनी यावेळी पत्र दिले.
विद्यार्थी भारती कडून अनेक इमेल पाठवून, रक्ताच्या ठस्याचे पत्र पाठवून, ट्विट करून, आंदोलने करून, उपोषण करून, यूजीसीची प्रेतयात्रा काढून, बोंबा मारो आंदोलन करूनही या सरकारने काहीही प्रतिसाद दिला नाही. आज तीन महिने होऊन सुद्धा विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला नाही. न्यायालयाने एवढा वेळ घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांचा विचार न करता निर्णय घेतला आहे असे विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
हा निर्णय जर सात दिवसात रद्द करण्याचा हुकूम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढला नाही तर विद्यार्थी भारतीच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे, आणि त्यात १० लाख मुलांची परिक्षा घेणार असाल तर त्यांच्या सुरक्षेचं काय? असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी भारतीच्या मागणीला प्रतिसाद मिळतो की पूर्वीप्रमाणेच मागण्या या कागदोपत्री राहतात हे पाहणं महत्वाच ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे